आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील म्हणाले..
मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत. २६ जानेवारीपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाऐवजी त्यांना खारघर येथील मैदान सुचवलं आहे.
पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की, खेळासाठी राखीव असलेल्या मैदानात उपोषणाला परावानगी नाही. शिवाय आझाद मैदानाची इतकी क्षमता नाही की, इथे मोठे आंदोलन होऊ शकेल. त्यामुळे जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क मैदान येथे आंदोलन करावं. दुसरीकडे, आझाद मैदानावर मराठा आयोजकांकडून तयारी सुरु झाली आहे.
हेही वाचा – ‘मनोज जरांगेंनी पंगतीत जेवावे, कारण..’; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भिती
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मुंबईकर, आमचे हाल होऊ नयेत असं वाटत असेल तर सरकारनं तोडगा काढवा. आम्ही पण ऊन, वाऱ्यात आहोत, आमचेपण हाल सुरु आहेत. सरकारचं शिष्टमंडळ नाही, काही अधिकारी भेटायला आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला यावं. तेच तेच मुद्दे सांगितले जात आहेत. आम्हाला विजयाचा गुलाल उधाळायचा आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.
आझाद मैदानात तयारी झाली आहे. स्टेज तयार झालं आहे. आम्हाला सरकारला सहकार्य करायचं आहे. त्यामुळेच आम्ही लोणावळ्यात थांबलो आहे. काही मंत्री आणि सचिव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळ जिथे म्हणेल, तिथं चर्चा करु. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा. मुंबईला आम्हाला येण्याची हौस नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.