मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अत्यंत खालावली, नाकातून रक्तस्त्राव
Manoj Jarange Patil | सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून अन्न, पाणी आणि औषधही घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्यपथक अंतरवलीमध्ये दाखल झालं. मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांची अवस्था म्हणाजे, ‘मला नाही अब्रू मी कशाला घाबरु’; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही, असे खोल गेलेल्या आवाजात पण ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठ्यांची लाट कशी उसळली आहे बघा. सरकारचे काय डोळे गेलेत का, अक्कल नाही का यांना अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारवर टीका केली.