ममतांनी बंगालला एकोणिसाव्या शतकात नेले- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
मुंबई |
गेल्या १० वर्षांत विकासाची कुठलीही कामे न करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालला एकोणिसाव्या शतकात परत नेले आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला. आपले पूर्वसुरी असलेल्या डाव्या आघाडीप्रमाणे तृणमूल काँग्रेस सरकारनेही राज्याच्या लोकांची फसवणूक केली आहे, असेही ते म्हणाले. पुरुलिया जिल्ह््यातील जॉयपूर येथे जाहीर सभेत बोलताना सिंह यांनी तृणमूलच्या ‘खेला होबे’ घोषणेची टर उडवली आणि यापुढे बंगालमध्ये केवळ काम आणि विकास दिसेल, असे सांगितले आहे.
तृणमूलच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता हिंसाचार व आक्रमण यांच्या कृत्यांनाच प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करतानाच; इतर राज्यांतून आलेल्या लोकांना वारंवार ‘उपरे’ संबोधून मुख्यमंत्री देशाचे विभाजन करू इच्छितात काय, असा प्रश्न राजनाथ यांनी विचारला. बंगालच्या लोकांना देशात इतरत्र ‘उपरे’ म्हणून वागणूक दिली जाते काय, असेही त्यांनी विचारले आहे.