मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्र बससेवेवरील बंदी ३० एप्रिलपर्यंत वाढवली
![Madhya Pradesh government extends ban on Maharashtra bus service till April 30](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Shivrajsingh-chouhan.jpg)
मध्य प्रदेश |
राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या व मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात जाणाऱ्या बससेवेवरील बंदी मध्य प्रदेश सरकारने ३० एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर महाराष्ट्र बससेवेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूनक २१ ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आलेली होती. याशिवाय, मध्य प्रदेश सरकारने भोपाळ, इंदौर, जबलपूर, बैतुल, छिंदवाडा, खरगोन आणि रतलाम येथील शाळा व महाविद्यालयं १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मध्य प्रदेशमध्ये करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील बस सेवेवरील बंदीचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांनी नागरिकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरी लॉकडाउनचा कुठलाही विचार नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलेलं आहे.