विधानपरिषद निवडणूक होणारच, १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात, बिनविरोधचे प्रयत्न अखेर फसले
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन अर्ज कायम असल्यानं १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची सूचना आल्यास अर्ज मागे घेणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसनं भरलेला तिसरा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गर्जे यांनी डमी अर्ज दाखल केला होता. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे ५, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली गेली होती. तर, भाजपच्या पाठिंब्यावर सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर ११ अर्ज कायम राहिल्यानं विधानपरिषदेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणूक होणारचं
राज्यसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर त्यांची आक्रमकता वाढली आहे. भाजपनं विधानपरिषदेसाठी ५ उमेदवार दिले आहेत. भाजपनं राज्यसभा निवडणुकीत पहिल्या पसंतीची १२३ मतं मिळवली होती. तर, महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६२ मतं मिळाली होती. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यानं विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करावी, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, काँग्रेसकडून दोन पैकी एकाही उमेदवाराचा अर्ज मागे न घेण्यात आल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.