Kasba Bypoll: टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देऊ, पण आधी… : चंद्रशेखर बावनकुळे
![Kasba Bypoll: Candidate from Tilak family, but first... : Chandrasekhar Bawankule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Chandrashekhar-Bavankule.jpg)
- कसब्यातील ब्राह्मणवृंदाच्या दबावपुढे भाजप पक्ष झुकला?
- टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची भाजपची तयारी
पुणे ः चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्यास तयार असल्याचे सांगितले. उद्या तीन वाजेपर्यंत महाविकास आघाडीने कसब्याची निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या हेमंत रासने यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊ. एका वर्षासाठी जनतेवर निवडणूक लादू नये. त्यामुळे काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. आमची कागदपत्रं तयार आहेत, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे पण त्यांच्याकडून (महाविकास आघाडी) तसे पाऊल उचलले जावे. कुणाल टिळक, गणेश बिडकर, धीरज घाटे हे सगळेच ताकदवान उमेदवार आहेत. पण एका जागेवरून सर्वजण लढू शकत नाहीत. यापैकी कोणीही उभे राहिले तरी १०० टक्के निवडून येईल. त्यामुळे टिळक परिवार किंवा कोणालाही डावलण्याचा प्रश्नच येत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रस्थान ठरत असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात सातत्याने रंजक घडामोडी घडताना दिसत आहे. याठिकाणी भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे टिळक परिवारासह कसब्यातील ब्राह्मण समाज मोठ्याप्रमाणावर नाराज झाला होता. यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटानेही टिळक घराण्याच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यामुळे कसब्यात भाजपविरोधातील नाराजी वाढली होती. हा धोका वेळीच लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्वत: टिळक परिवाराला फोन केला. यावेळी फडणवीसांनी टिळक घराण्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. कुणाल टिळक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिवसभरात दोनवेळा फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी फडणवीस यांनी, ‘सांभाळून घ्या, प्रचारात सक्रिय सहभाग घ्या’, अशी विनंती टिळक कुटुंबीयांना केली. देवेंद्र फडणवीसांच्या या मनधरणीनंतर शैलेश टिळक आणि कुणाल टिळक भाजप कार्यालयातील बैठकीला हजर झाल्याचे समजते.
आज दिवसभरातील राजकीय घडामोडींनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही हे संध्याकाळी टिळक परिवाराचे निवासस्थान असलेल्या केसरीवाडा येथे गेले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शैलेश टिळक यांची समजूत काढली. यानंतर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, टिळक कुटुंबीय आमच्यावर कधीच नाराजी होऊ शकत नाहीत. मुक्ता टिळक आमच्या नेत्या होत्या. टिळक कुटुंबीय नाराज असल्याचा कल्लोळ काही लोक करत आहेत, पण कोणीही नाराज नाही. अनेक मंत्री याठिकाणी येतात, त्यामुळे मीदेखील केसरीवाड्यावर आलो नाही. भाजपमध्ये कोणालाही जाणीवपूर्वक डावलले जात नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.