‘विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार’; काँग्रेस आमदाराचं खळबळजनक विधान
![Kailas Gorantyal said that Congress will split three to four votes in the Vidhan Parishad elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Kailas-Gorantyal-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्याने मतफुटीचा धोका असून कोण पराभूत होणार? याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, मी काल जे वक्तव्य केलं त्यावर आजही ठाम आहे. मी माझं वक्तव्य बदलणार नाही. मी काल काही आमदारांबाबत संकेत दिले होते आणि त्याचा आज आम्हाला फायदा झाला. मी काही आमदारांबाबत संकेत दिले होते, त्यापैकी दोन आमदार आज आमच्या पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. मी केवळ तीर मारला आणि माझा नेम अचूक लागला. आम्ही आणखी दोन आमदारांची वाट पाहत आहोत. मात्र मतदानापर्यंत काय होईल काय नाही याबाबत आत्ताच अंदाज वर्तवता येणार नाही.
हेही वाचा – हातात बंदूक, पूजा खेडकरांच्या आईचा शेतकऱ्यांना धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल
इतरांनीही काँग्रेसच्या तीन-चार आमदारांबाबत संशय व्यक्त केला होता. मात्र मी कोणाचं नाव दिलं नव्हतं. मी केवळ संकेत दिले होते आणि ज्याचा आम्हाला फायदाच झाला. ज्या आमदारांबाबत मी संशय व्यक्त केला होता ते आमदार बैठकीला आले, असंही कैलास गौरंट्याल म्हणाले.