“फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं!”, जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर!
![Jitendra Awhad's reply to Fadnavis!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/jitendra-awhad-on-devendra-fadnavis.jpg)
मुंबई |
रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी टीका केली आहे. “हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा”, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, अशी शंका घेणं हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर देखील काही ट्वीट्सच्या माध्यमातून आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2021
“पोलिसांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू”
“पाच वर्ष ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं, ज्यांचं कुशाग्र बुद्धीसाठी कौतुक केलं जातं, अशा राजकीय धुरंधरानं राज्याच्या मुख्य सचिवांबद्दल अशी शंका व्यक्त करणं हा त्या मुख्य सचिवांचा, त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची आणि त्यांच्या आवाक्याचा अपमान आहे. पोलिसांचं तर खच्चीकरण झालं आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणं सुरू आहे. आता सीताराम कुंटेंबद्दल आमच्या नावाने शंका उपस्थित करून त्यांना काय साध्य करायचंय? पण हे तर आहे की फडणवीसांनी किमान हे तरी मान्य केलं की आव्हाड अहवाल लिहू शकतात”, असं आव्हाड म्हणाले आहेत. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांचा हा आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पोलिस बदल्यांसंदर्भात मुख्य सचिवांनी तयार केलेला अहवाल, हा त्यांनी नाही तर कुण्या मंत्र्यांनी तयार केलेला दिसतो. कारण मी त्यांना ओळखतो.
या अहवालात ‘एखादा गुन्हा घडण्याची शक्यता असताना सुद्धा टॅपिंगची परवानगी असते‘, हा उल्लेख मुद्दाम वगळण्यात आला आहे. pic.twitter.com/zgyCOKthM8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 26, 2021
वाचा- “…फक्त मोदींची दाढी वाढतेय”, ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला!