बागेश्वर बाबांविरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक; म्हणाले, हा दिसेल तिथे बडवा..
“तुका म्हणे ऐशा नरा मोजून मराव्या पैजारा”- आव्हाड
मुंबई : मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री आता संत तुकाराम महाराजांवर भाष्य केल्याने वादात सापडले आहेत. संत तुकारामांच्या पत्नी जिजाबाईंबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. त्याचबरोबर विरोधी आघाडी महाविकास आघाडीही बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, हा दिसेल तिथे बडवा..आणि म्हणा ज्ञानदेव-तुकाराम अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. असल्या नकली बाबांनी आमच्या महापुरूषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटलं तर, तुका म्हणे ऐशा नरा मोजून मराव्या पैजारा. जोड्याने मारल पाहिजे याला, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी तातडीने माफी मागावी- मिटकरी
तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी तातडीने माफी मागावी. माफी न मागितल्यास त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे म्हणाले की, बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकारामांची बदनामी केली आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही.
दरम्यान, एका कार्यक्रमात बाबा धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, संत तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. त्याची पत्नी त्याला रोज काठीने मारायची. संत तुकारामांना कुणीतरी विचारलं होतं की तुझी बायको सगळ्यांना मारते आणि लाज नाही वाटत? ज्यावर संत तुकाराम म्हणाले होते की, ही देवाची कृपा आहे की मला मार खाणारी पत्नी मिळाली आहे. जर आपल्याला प्रेमळ पत्नी मिळाली असती तर आपण देवावर प्रेम केले नसते, आपण आपल्या पत्नीच्या प्रेमात पडलो असतो.