जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पवारांच्या फोनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिप्लाय
![Jitendra Awad's molestation case, Sharad Pawar's direct call to Chief Minister, Chief Minister Eknath Shinde's reply to Pawar's call](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Sharad-Pawar-Calling-780x470.jpg)
- राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल करणं योग्य नव्हे
- शरद पवारांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन
- महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा, सरकारचा हस्तक्षेप नाही
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. राजकीय आकसापोटी किंवा राजकीय हेतू ठेऊन कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोनद्वारे व्यक्त केली. त्यावर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात राजकीय आकस अजिबातच नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना दिलं. एबीपी माझाने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि त्यावरुन झालेल्या राड्यानंतर आव्हाडांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिला. पण जामीनाला २४ तास उलटत नाही तोच आव्हाडांवर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही हजर होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर मोठी गर्दी झाली होती. यावेळी गाडीसमोरील माणसांना दूर करताना आव्हाडांनी महिलेला बाजूला सारलं. यावरुनच संबंधित महिलेने आव्हाडांवर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाडांनी व्यतित होऊन आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. कालपासून याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘हर हर महादेव’ चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि मॉलमधील राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. याप्रकरणीही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होतो, तुमच्यासमोरच हे सगळं घडलं… कृपया राजकीय आकसापोटी अशी कारवाई योग्य नव्हे, अशी नाराजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोलून दाखवली. त्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांना आश्वस्त करताना म्हटलं, “महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात राजकीय आकस अजिबातच नाही. आव्हाड आणि माझे मधुर संबंध आहेत. कारवाईत सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये.”