देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले..
![Jayant Patil said that this statement of Devendra Fadnavis is ridiculous](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Jayant-Patil-780x470.jpg)
पुणे | बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस याचे हे विधान हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्या विरोधात आहे, हे बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीकर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याच पद्धतीने देतील. मात्र, यामध्ये नरेटिव्ह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. कदाचित सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना समोर आली असेल. त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न असेल.
हेही वाचा – श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी एका सभेत बोलताना हेलिकॉप्टरने मतदार आणू, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, हेलिकॉप्टरने मतदार आणू म्हणजे मतदारांची सर्व व्यवस्था करायची ठरवलेली दिसते आहे. आमच्या विरोधकांकडे भरपूर घबाड असल्याचे दिसते आहे. त्यामुळे मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी असावी. आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत, हे यावरुन दिसते. आम्ही जनतेच्या जिवावर निवडणुकांना सामोरे जात आहोत. मला विश्वास आहे, महाराष्ट्राची जनता याचा विचार नक्की करेल, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीने बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून जयंत पाटील म्हणाले, वंचितने बारामतीत आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी इतर काही जागांवरही सहकार्य करावे.