“हा अजेंड्याचाच भाग!”; गंगेतील मृतदेहांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला गंभीर आरोप
मुंबई |
करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याबरोबरच मृतांची संख्याही भयावह वाढल्याचं दिसून आलं. उद्रेकाच्या काळात देशात दिवसाला सरासरी साडेतीन ते चार हजार मृत्यूंची नोंद होत होती. याच काळात बिहार आणि उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगेच्या पात्रात अचानक मृतदेह तरंगाताना दिसू लागले. माध्यमांनी याकडे सरकारचं लक्ष्य वेधल्यानंतर राजकारण प्रचंड तापलं होतं. त्यावरून मोदी आणि योगी सरकारवर विरोधकांच्या टीकेचे धनीही ठरले. मात्र, याचं मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भूमिका मांडताना माध्यमांवर आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचं निदर्शनास आलं होतं. यावरून मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचं आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली.
दरम्यान, गंगेत सापडलेल्या मृतदेहावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांचं प्रसारमाध्यमांनी केलेलं वार्तांकन हा अजेंड्याचाच भाग होता, असा आरोप त्यांनी केला. महर्षी नारद जयंतीनिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र कुमार म्हणाले, “गंगेमध्ये २०१५ आणि २०१७ मध्येही मृतदेह आढळून आले होते. त्यावेळी तर करोनाची महामारी नव्हती. त्यामुळे आता आढळून येणाऱ्या मृतदेहांचा संबंध करोनाशी जोडणं हा अजेंड्याचाच भाग आहे, हे स्पष्ट दिसतंय,” असं नरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे.“माध्यमांनी महामारीच्या काळात आणि एरवी आपली काम चांगल्या पद्धतीने केलं आहे. यंत्रणेतील दोष दाखवून देणं ठिक आहे, पण हे सगळं योग्य वेळी आणि काळजीपूर्वक करायला हवं. त्यातून लोकांमध्ये भीती निर्माण न होता जनजागृती व्हायला हवी,” असं नरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. नारद मुनी हे जगातील पहिले पत्रकार होते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानतो. त्यामुळे त्यांची जयंती दरवर्षी संघाकडून साजरी केली जाते. यानिमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकाराने पुरस्कारही दिले जातात.