लोकसभा निवडणूक रणसंग्राम : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार
![It was the moment of entry of Shivajirao Adharao Patil into the Nationalist Party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Image-2024-03-23-at-12.50.31-PM-780x470.jpeg)
राष्ट्रवादी अजित पवार गटात २६ मार्चला प्रवेश करणार
पुणे | मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील कधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? असा प्रश्न विचारला जात होता. कारण शिरुर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. आता महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर परस्परसहमतीने शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झालं. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश कधी करणार अशी चर्चा होती. अखेर याच उत्तर मिळालं आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील येत्या २६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. अत्यंत भव्य असा हा पक्ष प्रवेशाचा सोहळा असेल. यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक देखील राष्ट्रवादीत दाखल होतील. शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असं सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच. ४५ पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याच आमच उद्दिष्टय आहे असं सुनील तटकरे म्हणाले.
हेही वाचा – SBIच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी! आज UPI सह ‘या’ सेवा राहणार बंद
किती मतांनी जिंकणार? शिवाजीराव म्हणाले..
शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पक्ष प्रवेशाआधी माझ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झालं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे असं आढळराव पाटील यांनी सांगितलं. माझ्या कॅलक्युलेशननुसार पहिली निवडणूक ३० हजारने जिंकली. दुसरी एक लाखाने, तिसरी तीन लाखाने आता चौथी निवडणूक रेकॉर्ड मताने जिंकेन, हा मला नाही जनतेला सुद्धा विश्वास आहे असं शिवाजीराव म्हणाले.