INS Vikrant : सोमय्यांची ३ तास चौकशी, ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ४ ओळीत प्रतिक्रिया
![INS Vikrant : सोमय्यांची ३ तास चौकशी, ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ४ ओळीत प्रतिक्रिया](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/INS-Vikrant-सोमय्यांची-३-तास-चौकशी-ऑफिसमधून-बाहेर-पडल्यानंतर.jpg)
मुंबई |
आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (INS Vikrant) आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची आज सलग तीन तास चौकशी करण्यात आली. सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेलेले सोमय्या दुपारी दोन वाजता कार्यालयातून बाहेर पडले. आजपासून सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे.
आयएनएस विक्रांतमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सोमय्यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल ४ दिवस नॉट रिचेबल होते. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १३ एप्रिल रोजी सुनावणी झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आजपासून सोमय्यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे.
- किरीट सोमय्यांची ४ वाक्यांत प्रतिक्रिया
आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोमय्या आज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता दाखल झाले. सुमारे ३ तास त्यांची चौकशी केली गेली. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांना सोमय्यांनी उत्तरं दिली. चौकशी संपल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “न्यायदेवतेचा मी सन्मान करतो. मला आनंद वाटतो आणि विश्वासही वाटतो, शेवटी सत्याचा विजय होईल. जी माहिती चौकशी अधिकाऱ्यांना पाहिजे, ती माहिती मी देतो आहे. सत्याचा विजय होईल, जय हिंद…”, एवढीच प्रतिक्रिया देऊन किरीट सोमय्या निघून गेले.
- प्रकरण नेमकं काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतारणा केली आहे, असे गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्यांवर केले. याप्रकरणी सोमय्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.