भारताचे चीनशी संबंध गुंतागुंतीचे- मुरलीधरन
![India's relations with China are complicated: Muralitharan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/india-china.jpg)
नवी दिल्ली |
भारत आणि चीन यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या संवेदनांचा व आशा-आकांक्षांचा आदर करण्याचे ठरवले असून त्यावरच संबंधातील पुढील दिशा अवलंबून असेल, असे भारताने बुधवारी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले, की चीनशी भारत चर्चा सुरू ठेवणार आहे. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अजून इतर अनेक प्रलंबित प्रश्न पूर्व लडाख भागात आहेत. दोन्ही देशांनी संघर्षाच्या क्षेत्रातून सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले आहे.
भारत व चीन यांच्यातील संबंधांवर पूर्वीच्या वाटाघाटींचा भंग झाल्याने काही परिणाम झाला आहे काय, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्यावर मुरलीधरन यांनी म्हटले आहे, की गेल्या वर्षी एप्रिल, मे महिन्यापासून चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेकदा केले होते. भारताच्या सैन्य दलांनी त्याला चोख उत्तर दिले होते. चीनच्या बाजूने करण्यात आलेले जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न भारताला अस्वीकार्य होते. या घडामोडींनी दोन्ही देशातील शांततेला बाधा आली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिम भागात काही घडामोडी झाल्या. सरकार नेहमी पूर्व लडाखला पश्चिम क्षेत्र असे संबोधत आले आहे. भारताचे चीनशी संबंध गुंतागुंतीचे आहेत. दोन्ही देशांनी नंतरच्या काळात एकमेकांच्या संवेदनशीलता व आशाआकांक्षा यांचा आदर करण्याचे ठरवले आहे. दोन्ही देशांनी मतभेद दूर करण्याचे ठरवले आहे, असेही मुरलीधरन यांनी म्हटले आहे.
वाचा- महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार; भाजपा मुख्यमंत्र्यांचं विधान