रेल्वे फेऱ्या वाढवा, तरच मते मागायला या…; पुणे-लोणावळा लोकलबद्दल प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
रेल्वे मंत्री, खासदारांच्या लोकल सुरु करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या
![Increase train journeys, come to ask for votes only...; Angry reactions of passengers about Pune-Lonavla local](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Talegaon-Railway-780x470.jpg)
तळेगाव : वडगाव मावळ कोरोनामुळे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून दुपारच्या रेल्वे लोकल बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यवसाईक यांची मोठी गैरसोय झाली आहे. रेल्वे मंत्री रावसाहेब दाणवे, खासदार श्रीरंग बारणे यांनी सदर लोकल सुरू करण्याची घोषणा देखील केली होती. त्यामुळे लोकल सुरू होतील, अशी आशा बाळगणाऱ्यांची घोर निराशा झाली. पुढाऱ्यांच्या घोषणेला आता नागरीकही कंटाळले आहेत. लोकल सुरू करा मगच मते मागा असा सूर नागरीकांमधून उमटू लागला आहे.
कोरोनामुळे गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून दुपारच्या रेल्वे लोकल बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायीक यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेमंत्री रावसाहेब दाणवे, खासदार श्रीरंग बारणे यांनी सदर बंद असलेल्या लोकल लवकरच सुरू होतील, अशी घोषणादेखील केली होती. ती घोषणा फक्त चर्चेतच राहिली. त्यामुळे लोकल सुरू होतील, अशी आशा बाळगणाऱ्यांची आता घोर निराशा झाली.
पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण आहे. त्याच प्रमाणे शैक्षणिक संस्थादेखील आहेत. मोठ्या प्रमाणात लोणावळा ते पुणे प्रवाशांची गर्दी असते. लोकल सेवा पूर्ण क्षमतेने नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातून तसेच लोणावळा परिसरातून विद्यार्थी शिक्षणासाठी वडगाव, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी जातात, लोणावळ्यावरून पुण्याकडे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी लोकल. त्यानंतर दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी पुण्याला लोकल आहे. तसेच पुण्याहून लोणावळा येथे जाण्यासाठी सकाळी ११.१५ मिनिटांनी लोकल यानंतर दुपारी तीन वाजता पुण्याहून लोणावळा येथे जाणारी लोकल आहे. दुपारच्या वेळेत म्हणजे जवळपास चार ते पाच तास लोकल नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
दुपारच्या लोकल बंद असल्यामुळे महाविद्यालय, क्लासला जाणारे विद्यार्थी, नोकरी व्यवसाय करून परतणारे नोकरदार, व्यावसायिक यांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होतो. लोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस, रिक्षा, आदी पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. बंद असलेल्या लोकल सुरू कराव्यात. यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनीदेखील अनेक निवेदने दिली आहेत. मात्र रेल्वे प्रशासन अद्याप कुंभकर्णाच्या निद्रेत असल्यामुळे प्रशासनास जागे कोण करणार, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आजी माजी आमदार दिल्लीत
सदरच्या बंद असलेल्या लोकल सुरू कराव्यात, तालुक्यातील रखडलेली कान्हे, वडगाव येथील अंडर बायपासची कामे सुरू करावीत. यासाठी आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे माजी अध्यक्ष रविंद्र भेगडे हे दिल्लीला जाऊन देखील आले. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडेदेखील लोकल सुरू कराव्यात यासाठी अनेकांनी निवेदने दिली. मात्र अध्याप रेल्वे प्रशासनाला जाग येईना.
आता मावळच्या लोकप्रतिनिधींनी रेल्वे रोको आंदोलन करावेः सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस
तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस म्हणाले, आतापर्यंत खासदार असो की रेल्वे मंत्री यांनी फक्त घोषणाच केल्या. रेल्वे प्रशासक जर रेल्वे सुरू करत नसेल तर सर्व लोकप्रतिनीधी रेल्वे रोको आंदोलन अभियान राबवून मावळच्या जनतेला न्याय द्यावा. या रेल्वे चालू झाल्या तरच आगामी निवडणुकीत मत मागायला यावे, अशी मावळवासियांकडून मागणी जोर धरू लागली आहे.