सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते- नवाब मलिक
मुंबई |
सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. “सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे,” असं ते म्हणाले आहेत.
“एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो. मात्र सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतंय आणि अजूनही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही,” असंही नवाब मलिक म्हणाले. “बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण रंगवण्यात आल्याचा,” आरोपही नवाब मलिक यांनी केला.