आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी इम्तियाज जलील यांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले..
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपला आहे. आता २० जानेवारीला आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावरून, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटलांना एक सल्ला दिला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, मराठा, मुस्लीम आणि ओबीसी समाजाचा विविध राजकीय पक्षांनी आपापल्या फायद्यासाठी वापर करून घेतलेला आहे. मराठा समाजाच्या हातात राज्यातील सर्व सत्तासूत्र असतानाही मराठा समाजावर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या एका छोट्या गावातील नेत्यामागे राज्यातील सर्व मराठा समाज एकवटण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी फक्त आंदोलन करून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्या विचारांचे लोक विधानसभा आणि संसदेत पाठवावी लागतील. याचा मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा.
हेही वाचा – विनेश फोगाटची खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा; म्हणाली..
महाराष्ट्रात आजघडीला सर्वात मोठा नेता कोणता असेल तर तो मनोज जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील यांची समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकता पाहून लोक त्यांच्याकडे आकृष्ट झालेले आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना लोक लगेच ओळखतात. पण जरांगे पाटील कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानले आहे. पण मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली, तेव्हा ते कशाप्रकारे आश्वासन देत होते. आपण सर्वांनी पाहिले. त्यात पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही, राम मंदिराचे उदघाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की, आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षांपासून असेच मुर्खात काढण्यात आलेले आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.
जोपर्यंत आपल्या विचारांचे लोक विधानसभा आणि लोकसभेत पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे मी माझ्या मुस्लीम समाजाला नेहमीच सांगत असतो. गल्लीत कायदे बनत नाहीत, त्यासाठी सभागृहातच जावे लागते. त्यामुळे जरांगे पाटलांनाही मी हाच सल्ला देईल. त्यांनी याचा विचार करावा. लोक त्यांच्यावर टीका करतील, पण त्याचा विचार त्यांनी करू नये. कारण आरक्षणावर समाधान शोधायचे असेल तर ते विधानसभा आणि संसदेतूनच होईल. जरांगे पाटील यांनी कितीही तीव्र आंदोलन केले तरी निर्णय सरकारच घेणार आहे, असं आवाहन खासदार जलील यांनी जरांगे पाटलांना केले.