आरोपांच्या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री’ आणि ‘वर्षा’वर होणार महत्त्वाच्या बैठका
मुंबई – आज सोमवारी सह्याद्री अतिथीगृह आणि वर्षा बंगल्यावर दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत गृहविभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. वर्षा बंगल्यावरील बैठकीत मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतील, अशी माहिती मिळत आहे. मंत्र्यांविरोधात होणाऱ्या आरोपांबाबत चर्चा होणार का? हेही पाहणं निर्णायक ठरणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहात महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक असणार आहे. महाविकास आघाडीच्या किरीट सोमय्यांचे आरोप आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, ते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
समन्वय समितीच्या बैठकीत तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये पहिला मुद्दा हा आगामी महानगरपालिकेचा मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काही महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यावर देखील चर्चा होणार आहे. तसेच तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होणारे आरोप, इडीचा ससेमिरा आणि किरीट सोमय्यांचं प्रकरण या तिन्ही विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.