नक्षलग्रस्त राज्यांच्या दिल्लीतील बैठकीआधी मुख्यमंत्र्यांची गृहविभागासोबत महत्त्वाची बैठक; गृहमंत्र्यांची माहिती
![Important meeting of the Chief Minister with the Home Department before the meeting of the Naxal-affected states in Delhi; Information of Home Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/dilip-valase-patil.jpg)
मुंबई |
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ६ दहशतवाद्यांच्या अटकेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांसोबत सुरक्षेच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवार २६ सप्टेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नक्षलवादी कारवाया आणि नक्षलवादी भागातील विकास कामांची सद्य:स्थिती व रखडलेल्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडेही वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार २६ सप्टेंबरला देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीला जाण्याची तयारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील नक्षलवादविषयक आढावा बैठक बोलावली होती.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नक्षलवादविषयक आढावा घेण्यासाठी दिल्लीत गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली असल्याने त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सह्याद्री येथे गृहविभागाची बैठक आयोजित केली आहे. त्याआधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. “नक्षलवादी कारावायांमुळे ज्या राज्यांना त्रास सहन करावा लागत आहे त्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दिल्लीच्या बैठकीत चर्चा होईल. राज्याच्या प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला जाईल,” असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.