“मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, तुला आगे ना पिछे”
उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका, म्हणाले, “भिकेचा कटोरा…”
जळगावः
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधल्या पाचोरा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पुलवामा हल्ल्याबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं. तसेच भाजपाकडून सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीवरील टीकेलाही उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधींनी प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न त्यांना एकट्याल्याच पडला नाही, तर जनतेला आणि शेतकऱ्यालाही पडला आहे. शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की, मी मरमर मरतोय पण माझं कर्ज काही फिटत नाही, परंतु पंतप्रधानांचा मित्र गेल्या ५ ते १० वर्षात जगातला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला? खरंच तो इतका यशस्वी झाला का? तसं असेल तर त्याची यशोगाथा काढा आणि द्या ती शेतकऱ्याला, कसं व्हायचं श्रीमंत हे सांगा त्यांना.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हे लोक माझ्यावर आरोप करतात की मी घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून जे केलं ते तुम्ही वणवण फिरूनही करू शकला नाहीत हे कबूल करा. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून ही जनता इथे आली आहे. हे लोक घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? ते म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं.