विधान परिषदेला मतदान करायचंय तर नवी याचिका करा, हायकोर्टाचा नवाब मलिकांना दिलासा नाहीच
मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने मलिकांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. विधान परिषदेला मतदान करायचंय, तर नवी याचिका दाखल करा, असं न्यायालयाने सांगितलं आहे.
- याचिका मागे घेऊन नव्याने याचिका करा, न्यायमूर्तींच्या मलिकांच्या वकिलांना सूचना
नवाब मलिक यांच्या आधीच्याच याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा देऊन विधान परिषद निवडणुकीबाबत मतदान करण्याची परवानगी देण्याबाबत सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. “ती राज्यसभा निवडणूक होती. त्यात विशेष पीएमएलए कोर्टाच्या आदेशाविरोधात तुम्ही (मलिक) याचिका केली होती. ती निवडणूक संपल्याने आता ती याचिका निरर्थक झाली आहे. त्यामुळे त्याच याचिकेत भरीव दुरुस्ती करून सुनावणीची तुमची विनंती मान्य होऊ शकत नाही. ही याचिका मागे घेऊन नव्याने याचिका करा”, अशा सूचना न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी मलिकांच्या वकिलांना केल्या आहेत.
- नवाब मलिक यांनी आधीची याचिका मागे घेतली
याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी सल्लामसलत करून भूमिका स्पष्ट करू, असे वकिलांनी सांगितल्याने न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी तशी संधी त्यांना देऊन पुन्हा येण्यास सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागणारा विषय निरर्थक ठरल्याने मंत्री नवाब मलिक यांनी आधीची याचिका मागे घेतली आणि नव्याने याचिका करण्याची उच्च न्यायालयाकडून मुभा मिळवली आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रयत्न केले. नवाब मलिक यांच्या याचिकेवर सोमवारी दुपारी सुनावणी झाली. तर देशमुख यांच्या याचिकेवर बुधवारी (१५ जून) सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता न्यायालय त्यांच्या याचिकेवर काय निर्णय देणार, त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार की राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला याचा फटका बसणार हे पाहावं लागणार आहे.