“जागा घ्यायची तर जीवपण घ्या,” रेल्वे रुळाशेजारील झोपड्यांना नोटीस पाठवल्याने श्रीकांत शिंदे आक्रमक, म्हणाले, “मी गोळी खातो…”
![“जागा घ्यायची तर जीवपण घ्या,” रेल्वे रुळाशेजारील झोपड्यांना नोटीस पाठवल्याने श्रीकांत शिंदे आक्रमक, म्हणाले, “मी गोळी खातो…”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/shreekant-shinde.jpg)
मुंबई |
रेल्वेने रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटीसा दिल्या आहेत. यानंतर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जागा घ्यायची तर जीवदेखील घ्या अशा शब्दांत सुनावलं आहे. पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरासह शेलार नाका, कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातील नागरिकांची श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली.
रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. यानंतर कल्याण पूर्वचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे नागरिकांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे जोपर्यंत रेल्वे प्रशासन येथील लोकांचे पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत याठिकाणी कारवाई होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला आपल्या जागांवर झालेलं अतिक्रमण आणि ते हटवण्याची आठवण झाली. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर रेल्वेने ३० ते ४० वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना नोटीसा बजावल्यात . आधीच करोनामुळे लोकं भयभीत झाली असून या नोटीसमुळे आणखी भीती पसरली आहे. रेल्वेने नोटीस बजावत सांगितले आहे की सात दिवसांत घरं खाली करा. पण हे शक्य आहे का?”. २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्या कायद्याने संरक्षित असल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.