राज्यकर्तेच खंडणीखोर असेल, तर..; सांगलीतील घटनेवरून भातखळकरांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र
![If the ruler himself is a ransom seeker, then; Bhatkhalkar criticizes Thackeray government over Sangli incident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/uddhav-and-atul-bhatkhalkar.jpg)
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैशांसाठी मृत रुग्णाला जिवंत असल्याचं दाखवून एका डॉक्टरने दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर संताप व्यक्त होत असून, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मृत रुग्ण जिवंत असल्याचे दाखवून इस्लापूर येथील डॉ. वाठारकर याने मृतदेहावरच दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारने खळबळ उडाली असून, वाठारकरला पोलिसांनी अटक केली आहे. अतुल भातखळकर यांनी या घटनेचा हवाला देत ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार करण्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात इस्लामपूर येथे घडली आहे. राज्यकर्तेच खंडणीखोर असेल, तर कोणाला कशाला भीती वाटेल. पैशाने राज्यकर्तेच विकत घेतले की सगळे प्रकरण मूळापासून मिटवता येईल, एव्हढा साधा हिशोब समाजकंटक करत आहेत,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.