पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभेची जागा लढवू , गुलाल उधळून दाखवते : स्वरदा बापट
![If given a chance by the party, Pune Lok Sabha, will contest the seat, Gulal flouts, Swarda Bapat, Pune, Marathi News,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Swarada-Bapat-780x470.png)
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर भाजपसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दावा ठोकला असला तरी बापट कुटुंबियांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज स्व. खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू, गुलाल उधळून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमच्यासोबत आहेत, असा मेसेज देण्यासाठी घरी आले होते, असंही त्यांनी सांगितलं.
आत्ता पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण आम्ही पक्षाला आधीच सांगितलं आहे, तुम्ही जी जबाबदारी द्याल ती आम्ही पार पाडू. त्यामुळे पक्ष जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू आणि पक्ष जिंकेल याची जबाबदारी घेऊ, असं स्वरदा बापट म्हणाल्या आहेत. मात्र, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्याने नाराजीचा फटका बसला होता. तसाच फटका बापटांना डावलला तर बसू शकतो का ? असा प्रश्न स्वरदा बापट यांना विचारलं असता त्यांनी या शक्यतेला साफ नकार देत दोन वेगळ्या निवडणुकांत वेगवेगळी परिस्थिती असते असं म्हटलंय.
भाजपमधून पुणे लोकसभेच्या जागेसाठी स्वरदा बापट यांच्यासह अनेक नेते शर्यतीत आहेत. यावर बोलताना स्वरदा बापट म्हणाल्या, बाबांच्या बाकी राहिलेल्या कामांसाठी मी असेल किंवा इतर कोणताही उमेदवार असेल आम्ही प्रयत्नशील राहू. मी आता पक्षात शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. सांगलीला नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. भाजप युवा मोर्चात देखील काम केलेलं आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली सगळी जबाबदारी पार पाडत आलेली आहे. तेव्हा आता पक्ष माझा कसा विचार करेल हे पक्ष नेतृत्व ठरवेल पण पक्षाने जर खासदार होण्याची जबाबदारी दिली तर ती देखील जबाबदारीने पार पाडेल, असं स्वरदा बापट म्हणाल्या आहेत.
दरम्यान, माझ्या म्हणण्याप्रमाणे ही पोटनिवडणूक होणार नाही, यावर पक्षच निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण गिरीश बापट यांचं अपूर्ण काम पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी पार पाडण्याची मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्या काय होईल? कोणी सांगू शकत नसल्याचं स्वरदा बापट म्हणाल्या आहेत.