‘टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, अन् अजित पवार संतापले…
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. भाजपने अजित पवारांविरोधात आंदोलन केलं, तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. भाजप आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून अजित पवार, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं. नितेश राणे यांनी एक पत्र ट्वीट केलं आहे, यात त्यांनी औरंगजेबाने तोडलेल्या मंदिरांची यादी दिली आहे. ‘काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे घोषीत करतो’, असं नितेश राणे या पत्रात म्हणाले आहेत.
नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. ‘टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?’, असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.