खून और क्रिकेट एकत्र कसं? भारत-पाक सामन्याला ठाकरे गटाचा तीव्र विरोध

IND vs PAK | आशिया कप २०२५ मध्ये बुधवारी दुबईत झालेल्या यूएईविरुद्धच्या सामन्यात भारताने दणक्यात ९ विकेट्सने विजय मिळवला. यामुळे ‘अ’ गटात भारताने आघाडी घेतली असली, तरी आता १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर राजकीय वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने या सामन्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, ‘माझं कुंकू, माझा देश’ या घोषणेनिशी १४ सप्टेंबर रोजी राज्यभरात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
संजय राऊत म्हणाले, की १४ सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळवला जात आहे. पण लोकभावना विरोधात आहेत. अजूनही पहलगाममध्ये जे २६ निरपराध लोक मारले गेले, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर आजही चालू असल्याचं सांगितलं जातं. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत.
पंतप्रधान म्हणाले खून और पानी एकसाथ नहीं बहेगा.. आमचा प्रश्न आहे की खून और क्रिकेट एकसाथ कैसे चलेगा? आमच्या महिलांचं सिंदूर उजाडलेलं इतक्या लवकर कसे विसरलात? सरकारचं सोडून द्या. भाजपा, आरएसएस, बजरंग दल, विहिंप जे भाजपाचे प्रचारक आहेत त्यांची भारत-पाकिस्तान सामन्याविषयी काय भूमिका आहे? हे स्पष्ट करावं, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.
हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! हवामान खात्याकडून अलर्ट जारी
उद्धव ठाकरेंनी या सामन्याचा निषेध केला आहे. १४ सप्टेंबरला शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंकू, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपावाले विरोधकांना राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. पण बाळासाहेब ठाकरेंनी भारत-पाकिस्तान सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियाँदाद घरी आला होता तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं की चहा प्यायचा आणि निघून जायचं. एकीकडे तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता कसे? लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? तोंडं उघडा की. ते बाटगे सरकारमध्ये शिवसेना म्हणून बसले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत-पाकिस्तान सामना होणार नाही. काय करतायत मिंधे? त्यांचे आमदार-खासदार, पुढारी? असा सवाल राऊतांनी केला.
भारत पाकिस्तान सामन्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळेच हे सामने खेळवले जातात. या सामन्यासंदर्भातल्या ऑनलाईन जुगाराची सगळी सूत्रं राजस्थान व गुजरातमधून हलवली जातात. भाजपाचे प्रमुख लोक त्यात सहभागी असतात, असा आरोपही संजय राऊतांनी केला.





