पाठीत खंजीर खुपसणारे ‘हे’ दुसरे..! – चंद्रकांत पाटील
![Push to Shiv Sena! Vachpa of Muktainagar removed in Matheran; 10 Shiv Sena corporators join BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/chandrakant-patil-thackeray.jpg)
- चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका
अमरावती |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काही लोक दररोज सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागले आहेत. पण, त्याने काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. मोर्शी येथे बुधवारी आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी कृ षिमंत्री डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्यात भाजपचे सरकार एकटय़ाच्या बळावर येईल, हे चित्र दिसत आहे. शिवसंग्राम, रयत, राष्ट्रीय समाज पक्ष यासारखे अनेक पक्ष आपल्यासोबत आहेत. अजूनही काही छोटे पक्ष सोबत येण्यास इच्छुक आहेत. पण, यापुढे नाव मोठे लक्षण खोटे असा पक्ष सोबत नको. आता कुणाच्याही कु बडय़ा नकोत. तुमची संगतही नको, असा टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला. माजी मंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे, तो कार्यकर्त्यांनी समोर आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. अनिल बोंडे पराभूत होतील, हे कु णालाही वाटले नव्हते. त्यांच्या विरोधात अनेक छुपे शत्रू कामाला लागले होते. आम्ही भाबडे असल्याने ते लगेच लक्षात आले नाही. आमचे काही उमेदवार तर फार थोडय़ा फरकाने पराभूत झाले. के वळ पंधरा आमदार कमी पडले. नाहीतर, सत्ता आपलीच असती, असेही पाटील म्हणाले.
- नाराज नेते अंधारात भेटतात
तपास यंत्रणा मागे लावून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोडण्याचे काम आमचे नाही. उलट अनेक नाराज नेते स्वत:हून रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटायला येतात. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नाराज लोकांना आधी सांभाळा, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना दिला. ‘ईडी’ची यादी माझ्याकडे नसून सर्वसामान्य लोकांकडून ती येत असल्याचेही चंद्रकांत पाटील, यांनी आवर्जून सांगितले.