breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले’; हरिभाऊ राठोड यांचं विधान चर्चेत

मुंबई | मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने काढला असून, मराठा समाजाच्या लढाईला यश मिळाले असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीही यावरून प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले परंतु तहामध्ये हरले, असं हरिभाऊ राठोड म्हणाले.

हरिभाऊ राठोड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये मात्र हरले, असे चित्र उभे ठाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित बहुजन आणि बारा बलुतेदार समाजाची ताटातील १७ भाकरी खाण्यामध्ये असं त्यांनी कुठला विजय प्राप्त केला, त्यांच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल, तर निश्चित मंत्री भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे.

हेही वाचा    –     मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जरंगे पाटीलांची मुख्य मागणी मुख्यमंत्री शिंदेंना मान्य

सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिलेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, आम्ही काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आता माञ मराठा समाजाला सगेसोयाऱ्यांच्या कुणबी दाखल्या प्रमाणे किवा कुणबी नोंदी प्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आहे. ओबीसींच्या १७ टक्के आरक्षणामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज आल्यावर बारा बलूतेदारांच्या ताटातील तसेच मायक्रो ओबीसीचे आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार आहे. ओबिसीचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील, यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे, जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता, असं हरिभाऊ राठोड म्हणाले.

या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, किंबहुना तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्याचबरोबर राठोड यांनी सरकार आणि ओबीसी नेत्यांचा जाहीर निषेध देखील व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button