“माझ्या जीवाला काही झालं तर शासन जबाबदार”; प्रसाद लाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
!["Government is responsible if anything happens to my soul"; Prasad Lad's letter to the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Udhhav-and-prasad-lad.jpg)
मुंबई |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक आणि त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता भाजपा नेते प्रसाद लाड यांनी जीवाला धोका असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहील आहे. त्याचबरोबर काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं सांगितलं आहे. कोकणातील जन आशीर्वाद यात्रेत प्रसाद लाड हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत होते. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबतही त्यांनी आक्षेप घेतला.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाष्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडून अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला नाही. नारायण राणे यांनी एक छोटं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई होऊ शकते. तर योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत कायदा न्याय देईल. राज्याचे मुख्यमंत्री असल्याने पोलीस त्यांचे आहेत. त्यामुळे पोलीस किती गांभीर्याने तक्रार घेतात आणि कारवाई करतात यावर प्रश्नचिन्ह आहे. पण चुकीचं वक्तव्य केलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांची दिलगिरी व्यक्त करायला हवी.”, असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
“जन आशीर्वाद यात्रेचा प्रमुख म्हणून मी नारायण राणे यांच्यासोबत होतो. पोलिसांकडून नारायण राणेंना जी वागणूक मिळाली, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. एक वडिलकीच्या नात्याने त्यांची काळजी घेण्याचं काम करत होतो. पण जेव्हा पोलिसांची त्यांच्याशी वागण्याची पद्धत बदलली. मी पोलिसांकडे कागदपत्रं मागितली, पण ते देऊ शकले नाहीत. राणेंविरुद्ध कारवाई जी त्यांच्या डोक्यात होती, ती ते करू शकले नाहीत. प्रकरण कोर्टात गेलं आणि त्यांना जामीन मिळाला आणि पोलिसांना देखील खरमरीत समज न्यायालयाने दिला. मला त्यानंतर रात्री २ नंतर धमकीचे सात-आठ फोन आले. काही फोन मराठीत होते काही हिंदीत होते. मार डालेंगे, शिव्या दिल्या, घर जलाएंगे, ऑफिस तोडेंगे या धमक्या दिल्या. मी या धमक्यांना भीक घालत नाही. तरीही विधानपरिषदेचे आमदार म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे. माझ्या जीवाला काही झालं तर त्याला शासन जबाबदार असेल.”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.