दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

Nashik : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये मोठा धक्का दिलाय. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनिता चारोस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुनिता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र आता चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिंडोरीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. चारोस्कारांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, असे त्यांनी म्हटले. दिंडोरी विधानसभेत सध्या महायुतीतील घटक पक्षाचे अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ आमदार आहेत. मात्र आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकच्या अनेक भागात पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार मदत करत आहे. 32 हजार कोटींची मदत सरकार देत आहे. सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभे आहे. शेतकऱ्यांना सरकार रस्त्यावर सोडणार नाही, आम्ही सर्व काम करतोय. भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, लोकांचा विश्वास भाजपवर, मोदींवर आहे. दिंडोरीत रस्त्यांचा प्रश्न खरच गंभीर आहे. पुढच्या वेळी येथे भाजपाचा आमदार द्या, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, काय आहे कारण?
रामदास चारोस्कर साहेब हा तुमचा शेवटचा प्रवेश आता कुठ जावू नका, असा मिश्कील टोला गिरीश महाजन यांनी रामदास चारोस्कर यांना लगावला. भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, यात घराणेशाही कुठ दिसते का? भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. मोदीजी हे तीन वेळा देशाचे नेतृत्व करत आहे, मी सात वेळा आमदार आहे. भाजप हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. येथे सर्वांना संधी मिळणार आहे, श्रद्धा सबुरी ठेवा. देवेंद्र फडणवीस हे खंबीर नेतृत्व आपल्या सोबत आहे. लोकसभेला थोडा फटका बसला पण विधानसभेला यश मिळाले. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काम सुरू करा. तुम्ही शब्द दिला आहे. चमत्कार करणार सर्व उमेदवार निवडून आणा. आम्ही विकास कसा करतो ते बघा, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी म्हटले. तर सकाळचा भोंगा आता बंद झाला आहे. मी जास्त बोलत नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
रामदास चारोस्कर म्हणाले की, 1995 ते 2004 पर्यंत मला दोन वेळेस दिंडोरीतील जनतेने विधानसभा निवडणुकीत काम करण्याची संधी दिली. दिंडोरी तालुक्याची धरणाचा तालुका म्हणून ओळख आहे. द्राक्ष आणि ऊसाचे पीक सर्वाधिक येथे घेतले जाते. मात्र सध्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. युवकांचा रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला भाजप हा एकमेव पर्याय वाटला आणि आज आम्ही सर्व प्रवेश करतोय. पक्ष जी जबाबदारी देईल, ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू, असे त्यांनी म्हटले.




