उत्तर प्रदेशात योगी सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गिरीश महाजनांचा इशारा; म्हणाले “आता महाराष्ट्र….”
उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेशातील सर्व जागांचे कल हाती आले असून एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपा २६७ तर समाजवादी पक्ष १२५ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचं म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून बसपा आणि ते फक्त चार जागांवरच आघाडीवर आहेत. दरम्यान भाजपा यशस्वी कामगिरी करत असल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची आशा वाढल्याचं दिसत आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असा घोषणा दिल्या. यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजनदेखील होते. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी निकालावरुन शिवेसना, काँग्रेसवर जोरदार टीका केली.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असंही म्हटलं आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असंही ते म्हणाले. “देशाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. भाजपाचे विचार, कर्तृत्व, बोलणं यावर लोकांचा विश्वास आहे. पंजाब सोडलं तर इतर राज्यांमध्ये भाजपाने मुसंडी मारली असून बहुमताकडे जात आहेत. याउलट काँग्रेसने पाचही राज्यात एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, पण त्यांना एकूण ३५ जागाही मिळत नाहीयेत. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“शिवसेना पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आली आणि मुख्यमंत्री बसवला. नुसती तोंडाची बडबड करण्याशिवाय यांना काय जमतं. पुढच्या निवडणुकीत दोन खासदार आणि २० आमदार निवडून आणून दाखवा,” असं आव्हान गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं. “संपूर्ण देश भाजपामय, मोदीमय झाला आहे. मोदी जगमान्य नेते असून त्यांच्या नेतृत्वावर जनता विश्वास दाखवत आहे,” असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.