सायबर प्रोजेक्टबाबत फडणवीसांची मोठी घोषणा ः शाळेतील लैंगिक अत्याचाराचे पडसाद विधान परिषदेत, शाळांमध्ये पोलीसदीदी उपक्रम राबवला जाणार
नागपूर ः गेल्या काही दिवासंपासून शालेय विद्यार्थींनीच्या लैंगिक शोषणात वाढ होत आहे. कल्याण आणि माटुंगा येथे विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ पावले उचलली पाहिजेत, अशी लक्षवेधी आज विधान परिषदेत मांडण्यात आली. आमदार उमाताई खापरे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सायबर प्रोजेक्ट राबवणार आहोत, जेणेकरून इंटरनेटवरील अश्लिल संहितांवर वचक ठेवता येईल, अशी माहिती दिली.
अभ्यास करता यावा याकरता कोविडच्या काळात लहान मुलांच्या हातात मोबाईल आले. मात्र, ऑफलाईन शाळा सुरू झाल्यानंतर मुलांच्या हातातील मोबाईल पालकांनी काढून घेतले नाहीत. यामुळे लहान वयातच मोबाईल आणि इंटरनेट हाती आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या हाताला अश्लील छायाफित येऊ लागल्या आहेत. अश्लील व्हिडीओ पाहिल्याने शालेय मुलींवरील अत्याचार वाढले, यावर सरकारने काहीतरी उपयायोजना करावी, अशी लक्षवेधी मागणी उमाताई खापरे यांनी मांडली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विकृती तयार होतेय ही बाब चिंताजनक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अश्लील संहिता मिळत असल्याने केंद्र आणि सर्वोच्च न्यायालायने याची दखल घेतली आहे. त्यामुळे पोर्नोग्राफी कॉन्टेट बॅन करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रात सायबर लॅब तयार केले आहेत. तसंच, मोठ्या प्रमाणात साबयर प्रोजेक्ट तयार केला जात असून अश्लील कॉन्टेटवर वचक ठेवली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसंच, विद्यार्थींनीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने पोलीसदीदी हा उपक्रम राबवला आहे. यातून महिला पोलीस शाळांना भेटी देत आहेत. हे काम १०० टक्के होत नसलं तरीही मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा मानस आहे. तसंच, शालेय विद्यार्थ्यींनीना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुड टच बॅड टचचे धडे देण्यात येणार आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कॅफेटेरिया बंद होणार?
शाळा परिसरात असलेले कॅफेटेरिया बंद व्हावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कारण शाळा परिसरातील कॅफेटेरियामध्ये विकृत मुलांकडून मुलींना जाळ्यात ओढलं जातं. मुलींना हिप्नॉटाइज केलं जातं, असं दानवे म्हणाले आहेत. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शाळेच्या आत आणि बाहेरच्या परिसरात जी इकोसिस्टम तयार झाली आहे ती योग्य आहे का हे तपासले जाणार आहे. यासाठी लवकरच एक यंत्रणा राबवली जाईल, असंही फडणवीस म्हणाले.
शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
मुंबईतील ८वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शाळेत सीसीटीव्ही लावण्याची सूचना केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत टप्प्याटप्प्याने शाळेत सीसीटीव्ही लावू असे सांगितले.