विद्यमान खासदारांनी कोणतेही विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत
फक्त बोलघेवडेपणा केला; आढळरावांची डॉ. कोल्हेवर टीका
![The incumbent MPs have not addressed any developmental issues](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Adhalrao-Patil-1-780x470.jpg)
पुणेः शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचा प्रचार जोमाने सुरू आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे दर्शन घेऊन जुन्नर तालुका दौऱ्याची सुरवात केली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी औक्षण करुन स्वागत केले.दौऱ्यात महिला, तरुण-तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला.”शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हा रे साथ है” असा नारा देत इथल्या नागरिकांनी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प केला.
दरम्यान, या प्राचीन मंदिराच्या संवर्धन व देखभाल दुरुस्तीसाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार अतुल बेनके, आशा बुचके या सर्वांनी निधी मागितला असता अजितदादांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत पावणे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामास्थांच्या मार्गदर्शनाखाली आता काम देखील सुरु झाले असल्याचे आढळराव यांनी सांगितले. या नंतर निरगुडे येथील रोकडे फार्म हाऊस बेजवाट मध्ये कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाचा सर्वांगिण विकास होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला मोदी यांच्या विकासात्मक धोरणाला साथ देणारा खासदार निवडून द्यायचा आहे. २०१९ ला त्यांच्या विरोधातला खासदार निवडून देण्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. कुठल्याही गावात मी गेलो की मला सांगितले जाते विद्यामान खासदार मागील पाच वर्षांत एकदाही गावात आले नाहीत. त्यांनी कोणतेच विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, फक्त बोलघेवडेपणा केला आहे, हे विसरू नका.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, विरोधक सांगत आहेत आपले संविधान बदलले जाणार आहे. हे साफ खोटे आहे, असे काहीही होणार नाही. आरक्षणाबाबतही गैरसमज पसरवले जात आहे. कोणीही आरक्षण किंवा संविधान याला हात लावू शकत नाही. काही घटकांनी आदिवासी नागरिकांची दिशाभूल करून भीती दाखवून आदिवासी नागरिकांचा फायदा घेतला. त्यांच्या विकासासाठी काहीही केले नाही. मोदीजी यांना समाजातील सर्वच घटकांचा विकास करायचा आहे. आता आपल्याला मोदीजी परत पंतप्रधान होणार असल्यामुळे त्यांच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. घड्याळासमोरचे बटन दाबून मला विजयी करा अशी विनंती पाटलांनी केली.
आमदार अतुल बेनके म्हणाले की,आढळराव दादांनी खासदार नसतानाही मतदारसंघात मोठा निधी खेचून आणला.विद्यमान खासदार मागच्या पाच वर्षांत आपल्याला दिसलेही नाहीत.अभिनेत्याला निवडून देण्यापेक्षा आपल्याला लोकांच्या मनातील नेत्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे. आपल्या तालुक्यातून दादांना जास्तीत-जास्त मताधिक्या देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करु.”
आमदार शरद सोनवणे म्हणाले की,आदिवासी भागात सर्वांत पहिले टाँवर शिवाजी दादांमुळेच झाले. शिवाजी दादांच्या विजयासाठी आपण सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करूयात. दादा खासदार नसतानाही त्यांनी मोठा निधी आपल्या तालुक्याला मिळवून दिला आहे. आपला हक्काचा माणूस आपला खासदार झाला तर आपले सर्व प्रश्न हक्काने सोडविले जातील.