काही घोड्यांवर जास्त बोली लागली, ते विकले गेले, शिवसेना उमेदवाराच्या पराभवाने खासदार संजय राऊत खवळले
![काही घोड्यांवर जास्त बोली लागली, ते विकले गेले, सेना उमेदवाराच्या पराभवाने संजय राऊत खवळले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/काही-घोड्यांवर-जास्त-बोली-लागली-ते-विकले-गेले-सेना-उमेदवाराच्या.jpg)
मुंबई : “काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात. पण विकले जाणारे लोकं कुणाचीच नसतात. साधारण ६ अपक्षांनी आम्हाला धोका दिला. ज्या अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही मत दिलं नाही. त्यांची यादी आमच्याकडे आहे”, असा गर्भित इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना दिला.
संख्याबळ असूनही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. कोणत्या अपक्ष आमदारांनी मविआला शब्द देऊनही धोका दिला, याचा शोध घेतला जातोय. भाजपला जाऊन मिळालेल्या संबंधित आमदारांकडे राऊतांचा रोख होता. दगाबाजी करणारे आमदार कोण आहेत, त्यांची नावं आम्हाला माहिती आहेत. आता पाहुयात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
- आम्ही हरलो पण भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला नाही!
“आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला, असा होत नाही. संजय पवार यांना पहिल्या फेरीत ३३ मते मिळाली होती. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत २७ मते मिळाली. हादेखील संजय पवारांचा विजयच आहे. पण शेवटी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया अशी आहे की, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक विजयी ठरले. घोडेबाजारातील काही घोडे जास्त किंमतीला विकले गेल्याने संजय पवार यांचा पराभव झाले”, असं राऊत म्हणाले.
- म्हणून आम्हाला दगाफटका झाला…!
महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच आमच्यासोबतचे छोटे पक्ष असतील त्यांचं एकही मत फुटलेलं नाही. फक्त घोडे बाजारातील विकायला असलेल्या संबंधित अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही तो न पाळल्याने आम्हाला दगाफटका झाला, असं राऊत म्हणाले.