“शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी बहुसंख्य विद्यार्थी हिंदू,” ‘त्या’ घटनेवरुन जितेंद्र आव्हाड संतापले
मुंबई |
मध्य प्रदेशात नुकतंच एका शाळेवर हल्ला करण्यात आला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी मध्य प्रदेशातील एका कॅथलिक शाळेवर दगडफेक केली. या शाळेत विद्यार्थ्यांचं धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप करत ही दगडफेक करण्यात आली. दरम्यान ज्यावेळी शाळेवर हल्ला झाला तेव्हा आतमध्ये विद्यार्थी परीक्षा देत होते. दरम्यान या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
- नेमकं काय झालं…
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी मध्य प्रदेशातील एका कॅथलिक शाळेवर दगडफेक केली. शाळेच्या पदाधिकाऱ्यांवर या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप केला. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
मध्यप्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंज बसोडा इथल्या सेंट जोसेफ शाळेत हा प्रकार घडला. सोमवारी दुपारी साधारण बारा-साडेबारा दरम्यान ३०० लोक या शाळेच्या बाहेर जमा झाले आणि आंदोलन करु लागले. यावेळी शाळेत १२वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. काही काळातच हा जमाव आक्रमक झाला आणि शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली. शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी टायन्युमकल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की या जमावाक़डे लोखंडी सळया आणि दगड होते, ते शाळेवर दगडफेक रताना ‘जय श्रीराम’ म्हणत होते.
- जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट –
“व्हिडिओमधे शाळेवर हल्ला करण्यात येत आहे ती मध्यप्रदेश राज्यातील शाळा आहे. जरी ती शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी तिथले बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक गण हिंदूच आहे एवढे सुद्धा कळत नाही का? अशा प्रकारे हल्ला करून लहानग्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? हेच आहेत का तुमचे संस्कार?,” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
ह्या व्हिडिओमधे शाळेवर हल्ला करण्यात येत आहे ती आहे मध्यप्रदेश राज्यातील
जरी ती शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी तिथले बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक गण हिंदूच आहे एवढे सुद्धा कळत नाही का?
अशा प्रकारे हल्ला करून लहानग्यांना तुम्ही काय शिकवणार आहात?
हेच आहेत का तुमचे संस्कार ? pic.twitter.com/DV4kbTJxek— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021
- पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप –
शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. “आम्ही पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र त्यांना आम्हाला ही खात्री दिली की हा जमाव फक्त थोडी घोषणाबाजी करेल आणि मग शांततेत निघून जाईल. त्यानंतरही आम्ही पोलीस संरक्षण देऊ असं ते म्हणाले होते. मात्र सगळा जमाव तोडफोड करुन निघून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले,” असं त्यांनी सांगितलं होतं.
ब्रदर अँथनी यांचे हे आरोप फेटाळत गंज बसोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भरत भूषण म्हणाले होते की, “हे शांततापूर्ण आंदोलन होतं. पण काही समाजकंटकांनी या संधीचा फायदा घेत शाळेवर दगडफेक केली. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या काही काचा फुटल्या. शाळेला पोलीस संरक्षण देण्यात आलं असून आरोपींवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे”. ही शाळा ११ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. भोपाळच्या मलाबार मिशनरी सोसायटीकडून ही शाळा चालवली जाते. १५०० विद्यार्थी इथं शिक्षण घेत असून त्यापैकी बहुतांश जण हिंदू आहेत.
विश्व हिंदू परिषदेचे नेते निलेश अग्रवाल ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, ते म्हणाले, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी या शाळेतल्या आठ मुलींचं धर्मांतर करण्यात आलं होतं. बालहक्क संरक्षणासाठीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष पिर्यांक कनुगो यांनी या प्रश्नाबद्दल विदिशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं होतं. मात्र अग्रवाल यांचे हे आरोप शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी यांनी फेटाळले आहेत. तर पोलीस अधिकारी भूषण यांनीही शाळेवरचे धर्मांतराचे आरोप फेटाळले असून ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट केलं.