“आम्ही रेशीमबाग येथे भेट दिली, तुमच्यासारखा गोविंदबागेत नाही”; एकनाथ शिंदे
![Eknath Shinde said that we visited Reshim Bagh, there is nothing like you in Govind Bagh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/eknath-shinde-2-780x470.jpg)
अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा
नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरुवातीला आरोप-प्रत्यारोप आणि चौकशांनी गाजलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधकांनी सभागृह गाजलं. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना सभागृह दणाणून सोडलं. अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा. म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत आहे.
आम्ही रेशीमबाग येथे भेट दिली, त्यावरून राजकारण केलं गेलं. मला रेशीमकिडा म्हटलं गेलं. पण मी सांगू इच्छितो की, मी रेशीमबागेत गेलो, तुमच्यासारखा गोविंदबागेत नाही. आम्हाला म्हणतात, बाप चोरला. अहो बाळासाहेब आमच्यासाठी पितृतुल्यच आहेत. जन्म दिला नसला तरी त्यांनीच आम्हाला घडवलं. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रतारणा आम्ही कधीही केली नाही, असंही शिंदे म्हणाले.
प्रबोधनकारांचे वारस लिंबू-टिंबूची भाषा करतात? जे घारबाहेर पडत नाहीत ते हिंमतीची भाषा करतात? मी पातळी सोडून बोलणार नाही पण राष्ट्रवादीची शिवसेना असं जयंत पाटील बोलले ते योग्य बोलले. काँग्रेससोबत गेलात तेव्हा बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार गमावलात, दुसऱ्यावर टीका करताना आत्मपरीक्षण करा. एक माणूस चुकू शकतो, पण 50 माणसं कशी चुकतील? आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू, पुन्हा आमचं सरकार आणू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाच्या लालसेसाठी बाळासाहेबांचे विचार संपविण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी बाळासाहेबांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले. बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले. खुर्चीसाठी तुम्ही पाप केलं. एक म्हण आहे, ‘हिऱ्यापोटी गारगोटी..’, असंही शिंदे म्हणाले.