‘पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
![Eknath Shinde said that Maharashtra is number one in the country due to infrastructure and foreign investment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Eknath-Shinde-1-780x470.jpg)
ठाणे : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मिरा भाईंदर महापालिकेच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मिरा भाईंदर हे शहर मुंबई व ठाणे शहराच्या बरोबरीने पुढे यायला हवे. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम हाती घेणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांचा टोलचा प्रश्न मिटेल. तसेच मुंबई सागरी किनारा मार्गही विरार ते थेट पालघर पर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच बांद्रा–वर्सोवा आता विरार पर्यंत आणणार आहे. तसेच मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती
राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख केली असून राज्यातील साडेबारा कोटी जनतेला त्याचा लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी लेक लाडकी लखपती योजनेतून मुलींच्या बँक खात्यात निधी देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात यासह अनेक निर्णय हे सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.