‘काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा प्रसिद्ध करायला हवा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
![Eknath Shinde said that Congress should not publish a manifesto but an apology](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Eknath-Shinde-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडली. भाजपाचे चंद्रपूरचे उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची गुढी आपल्याला नक्कीच उभारायची आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नक्कीच हॅट्रीक करतील. ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असाच जल्लोष आपल्याला करायचा आहे. कारण पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार ही गॅरंटी १४० कोटी देशवाशीयांनी घेतली आहे. आज देशामध्ये मोदींची गॅरंटी चालते. मात्र, इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणाचाही भरवसा नाही. काँग्रेसचे सरकार असताना आपला देश कोणत्या परिस्थितीत होता हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, दंगली, भ्रष्ट्राचार, अशा अनेक गोष्टींनी आपला देश ग्रासला होता. पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात विकास होत आहे.
हेही वाचा – देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे
काँग्रेसच्या ५० वर्षांच्या काळात जी विकासकामे झाले नाही त्यापेक्षा जास्त विकासकामे गेल्या १० वर्षात झाले आहेत. आता काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खऱ्या अर्थाने ५० वर्षात देशाला तुम्ही कुठे घेऊन गेलात? याबाबत ५० वर्षाचा हिशेब आपण त्यांना मागितला पाहिजे. त्यामुळे काँग्रेसला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा जाहीर करायला हवा. कारण देशाला खड्ड्यात घालण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.