![Due to the proclamation made by the Opposition, the work of both the Houses of Parliament has been disrupted twice](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/विरोधी-पक्षांनी-केलेल्या-घोषणाबाजीमुळे-आजही-संसदेच्या-दोन्ही-सभागृहांचं-कामकाज-दोनदा-तहकूब-.jpg)
नवी दिल्ली: पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्धगित झालं.
राज्यसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी एका वर्तमानपत्राच्या कार्यालयावर ईडी आणि प्राप्ती कर खात्यानं घातलेल्या धाडीचा मुद्दा उपस्थित केला. तसंच पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. नंतर १२ वाजता प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षानी घोषणाबाजी सुरुच ठेवल्यानं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली
.
लोकसभेत आज सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बसपासह सर्वच विरोधी पक्षांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाजात व्यत्यय येऊ लागला होता. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली आणि घोषणाबाजी सुरू केली आणि फलक दाखवले
याबाबत ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी सदस्यांनी वेलमध्ये येऊ नये, चर्चा करावी, अशी त्यांना सूचना केली. मात्र घोषणाबाजी कायम राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु होताच गदारोळ कायम राहिल्यानं लोकसभेचंही कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.