‘आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो’; देवेंद्र फडणवीसांचे दानवेंना प्रत्युत्तर
![Devendra Fadnavis said that whenever we do something, we do it completely](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ambadas-danve-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
जिल्हा, तालुका, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा देवेंद्र फडणवीस जी, असं अंबादास दानवेंनी ट्विट करत म्हटलं आहे.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.
त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.