‘देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम’; प्रणिती शिंदे यांची टीका
![Devendra Fadnavis is EVM CM, says Praniti Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Devendra-Fadnavis-is-EVM-CM-says-Praniti-Shinde-780x470.jpg)
मुंबई | काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. तसेच, जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, की वाढलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीवर आम्ही शंका उपस्थित केली आहे. २०१९ ते २०२४ दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास ५ लाख मतदार संख्या वाढली होती. लोकसभा निवडणूक २०२४ ते विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान ७५ लाख मतदार संख्या कशी काय वाढली? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लष्कराचे संचलन
देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम : प्रणिती शिंदे
लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली होती. शांतीत क्रांती करु असं लोक मम्हणाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी कट-कारस्थान केलं. चार महिन्यांत मतदार इतके कसे काय वाढले हा आमचा सरळ प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठ्यांच्या तीव्र भावना होत्या, आता देवेंद्र फडणवीसच त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून थोपवले गेले आहेत. ईव्हीएम सीएम असंच देवेंद्र फडणवीस यांना म्हणता येईल, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्यामुळे अनेक योजना थांबल्या आहेत. केंद्र शासनाचा जो निधी मिळतो त्यापैकी ७० टक्के निधी अद्याप मिळालेला नाही. रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी थांबवण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनेचा निधी जवळपास ६० टक्के रक्कम आलेली नाही. अनेक कामं थांबवण्यात आली आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला जबाबदार भाजपा आहे, असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.