“सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस नैराश्यात, त्यांच्यावर…”; आदित्य ठाकरेंचा टोला
![“सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस नैराश्यात, त्यांच्यावर…”; आदित्य ठाकरेंचा टोला](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/fadanvis-aditya.jpg)
मुंबई |
कोल्हापूर विभागात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने खूप चांगली कामे सुरू आहेत. या कामांचा आपण आढावा घेतला असून इथल्या काही योजना राज्याच्या इतर भागांमध्ये राबवल्या जाऊ शकतात का, यासंदर्भात आपण माहिती घेत असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ते कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
नुकतेच फडणवीस यांनी हे सरकार इमारतींमध्ये अडकून पडले आहे, अशी टीका केली होती. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तिथे करोना हाताळणीत भाजपा सरकार अपयशी ठरलं, तसेच बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. कारण त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यामुळे ते असं बोलत असतात. त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मुंबई महापालिकेने नारायण राणे यांनी नोटीस पाठवली आणि यांच्या बंगल्यावर कारवाई सुरू आहे. ही कारवाई सूडबुद्धीने सुरू आहे, अशी विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “या विषयात मी जाणार नाही, त्याबद्दल मी बोलणार नाही. आम्ही आमचे काम करत राहणार.” यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी किरीट सोमय्या आणि नारायण राणेंकडून सुरू असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. शनिवारी आदित्य ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या या दोन्ही नेत्याकडून शिवसेनेच्या नेत्यांवर सुरू असलेल्या आरोपांबदद्ल विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “मला वाटतं की त्यांना किती महत्व द्यायचं, हे आपलं आपण ठरवायचं.”