#CoronaVirus: “रात्री आठ वाजता घोषणा करायला लॉकडाउन म्हणजे नोटबंदी नव्हे”- जलसंपदा मंत्री जयंत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/375648-untitled.jpg)
करोना व्हायरसला रोखण्यासाठी पुढील २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. पण, “जगभरातील करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा विचार करता पंतप्रधानांनी देशातील लॉकडाउन आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री आठ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता”, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
“पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिली नाही. त्यामुळे देशभर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणावर किराणा मालाच्या दुकानांकडे धाव घेऊन साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवनावश्यक गोष्टींबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे”, अशी टीका ट्विटरद्वारे जयंत पाटील यांनी केली. तसेच, महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही असेही स्पष्ट केले. “महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे. असे आश्वासनही पाटील यांनी दिले.
जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता. #21daysLockdown
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 24, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कारण अत्यावश्यक गोष्टी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी “माझे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये.” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.