#CoronaVirus: “मुस्लिमांसाठी भारत स्वर्गच”; केंद्रीय मंत्र्याचे ‘इस्लामोफोबिया’वरुन देशावर टीका करणाऱ्यांना उत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Muslim-1.jpg)
भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्गच आहे. इथे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक हक्क सुरक्षित आहेत, असं मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केलं आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनने (ओआयसी) देशामधील मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त करताना भारत इस्लामविरोधी असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यालाच उत्तर देताना नकवी यांनी पीटीआयशी बोलताना आपले मत मांडले आहे.
“भारतीय मुस्लिमांची भरभराट होत आहे. वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करणारे अशा मुस्लिमांचे मित्र असू शकत नाही,” असा टोलाही नकवी यांनी लगावला आहे. “भारतामधील सर्व नागरिकांना संविधानिक, सामाजिक आणि धार्मिक हक्क भारतीय संविधानानेच दिले आहेत,” असंही नकवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
ओआयसीने रविवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये भारताने मुस्लीम बांधवांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत असं म्हटलं होतं. तसेच देशामध्ये इस्लामविरोधी घटना थांबवाव्यात असंही ओआयसीने म्हटलं होतं. भारतीय प्रसारमाध्यमेही मुस्लिमांबद्दल नकारात्मक वृत्तांकन करुन दुजाभाव करत असल्याचा आरोप ओआयसीने केले होता.
याच संदर्भात नकवी यांना विचारण्यात आलं असता, “आम्ही आमचे काम योग्य पद्धतीने करत आहोत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान देशातील जनतेशी संवाद साधतात तेव्हा ते देशातील १३० कोटी जनतेच्या भल्याबद्दल बोलतात. जर काही लोकांना हे दिसत नसेल तर ती त्यांची अडचण आहे,” असं मत त्यांनी मांडलं.
“पारंपारिक आणि व्यावसायिक पदधतीने टीका करणारे काही गट अजूनही काम करत असून ते चुकीची माहिती पसरवत आहेत. अशा नकारात्कम आणि वाईट विचारांच्या शक्तींपासून आपण सावध रहायला पाहिजे. खोटी माहिती पसरवणाऱ्याच्या त्यांच्या या अभियानाला आपण एकत्र येऊन हरवलं पाहिजे,” अशी अपेक्षा नकवी यांनी व्यक्त केली.
दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्यानंतर विशिष्ट समाजाबद्दल जाणून बुजून अपप्रचार केला जात असल्याची टीका केली जात आहे. यावरुनच आयओसीने भारताने यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती.