#CoronaVirus: महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव- जलसंपदामंत्री जयंत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोनाशी निकराने लढा देत आहे, त्याला यशही मिळत आहे. तरीही भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून, करोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसे अपयशी ठरले आहे, अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत, असा हल्लाबोल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला.
राज्यपालांकडे सारखे जाऊन, त्यांना त्रास देण्यापेक्षा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नाला पाठिंबा द्या, या लढाईत प्रत्यक्ष सहभागी व्हा, असा सल्लाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्याही चिंताजनक आहे, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर आहे, या सर्व आघाडय़ांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला असून, सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जयंत पाटील यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन केले.