त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचं वादग्रस्त विधान, म्हणाले, “अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…”
![Controversial statement by Tripura Chief Minister Biplab Kumar Deb](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/tripura-12.jpg)
नवी दिल्ली |
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या अवमानाची भीती बाळगू नये, असं म्हटलंय. तुम्ही तुमचं काम करताना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती बाळगू नका, मी अशा प्रकरणांना सामोरा जाईल. न्यायालय आदेश देऊ शकते पण आदेशाचे पालन कोण करणार? कारण पोलीस माझ्या नियंत्रणाखाली आहेत,” असंही बिप्लब देव म्हणाले. शनिवारी रवींद्र भवनात टीसीएस अधिकाऱ्यांच्या २६ व्या द्विवार्षिक परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “मला अनेक अधिकारी सांगतात की न्यायालयाचा अवमान होईल, या भीतीमुळे ते एखादं काम करू शकत नाहीत. अशी भीती कशाला? न्यायालय निर्णय देण्याचं काम करते पण पोलीस त्याची अंमलबजावणी करतात आणि पोलीस माझ्या नियंत्रणात आहेत. पोलिसांकडे त्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि मी त्याचा साक्षीदार आहे,” असंही ते म्हणाले.
तसेच आतापर्यंत न्यायालयाचा अवमान केल्यानं किती लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं, मी इथे आहे, न्यायालयाच्या अवमान प्रकरणात तुम्ही तुरुंगात जाण्यापूर्वी मी जाईल, असं देब म्हणाले. तसेच “कोणालाही तुरुंगात टाकणं सोप्पं नसतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांचं काम लक्षात ठेवलं जातं. जर कोर्ट पोलिसांना एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यास सांगत असेल तर आरोपी सापडलाच नाही, असं पोलिसांनी सांगावं. शेवटी ताकद तर बापाच्या हातात असते ना,” असंही देब यांनी म्हटलंय.
दरम्यान, देब यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री स्वतः न्यायपालिकेचा अपमान कसे करू शकतात, असा सवालही करण्यात येत आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी देब यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे, सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे. न्यायालयाप्रती आणि न्यायव्यवस्थेप्रती गंभीर अनादर दाखवणाऱ्या जेव यांच्या वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का?” असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.