‘जर बिहार जिंकलो तर संपूर्ण भारत जिंकू’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विश्वास
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बिहार जिंकला तर अख्खा भारत जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटणा येथे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुका सर्व विरोधी पक्षांना एकजुटीने लढवायच्या आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून काँग्रेसला विजयी करा, एकत्र काम करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
‘सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे’
बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारन्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, 2024 मध्ये आपण सर्व विरोधी पक्षांना एकजुटीने लढायचे आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींनी पहिले पाऊल टाकले. मी आणि राहुल गांधींनी विचार केला की आपण सर्व नेत्यांशी बोलू आणि त्यानुसार पावले उचलू… त्याच उद्देशाने आपण ही बैठक घेत आहोत.
तुम्ही सर्वांनी मिळून काँग्रेसला विजयी करा – खर्गे
खर्गे पुढे म्हणाले की, बिहार कधीही आमच्या पक्षाची तत्त्वे आणि विचारधारा सोडू शकत नाही. बिहार जिंकला तर संपूर्ण भारत जिंकू. काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. किरकोळ मतभेद विसरून देश आणि संविधान वाचवण्यासाठी लढा.
विरोधकांच्या बैठकीत राहुल गांधी-खर्गे पोहोचले
तत्पूर्वी, राहुल गांधी आणि खर्गे शुक्रवारी सकाळी पाटणा विमानतळावर पोहोचले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन्ही दिग्गजांचे स्वागत केले. राहुल आणि खर्गे पाटणा विमानतळावर उतरल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. केसी वेणुगोपालही त्यांच्यासोबत होते. राहुल गांधी आणि खर्गे यांनी विमानतळावरून थेट काँग्रेस प्रदेश कार्यालय सदकत आश्रम गाठले. या दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या स्वागतासाठी सदाकत आश्रम सजवण्यात आला होता. राहुल गांधी बिहारमध्ये पोहोचल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.