राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणाविरोधात वाकड पोलिसांत तक्रार अर्ज दाखल
![Raj Thackeray, against provocative speech, Wakad, filed a complaint with the police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/raj-thakre-wakad-police-station-780x470.jpg)
पिंपरी : गुढीपाडव्या निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरून त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज ठाकरे यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम विरोधात भूमिका घेतली. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. तेव्हा राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू–मुस्लिम दंगल घडू शकते असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज पिंपरी- चिंचवडमधील वाकड पोलिसांत वाजीद रजाक सय्यद यांनी दिला आहे.
आपल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांनी मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदू- मुस्लिम तणाव निर्माण होऊ शकतो. राज ठाकरे यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत भडकाऊ भाषण केले आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचेल असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यांनी केलेलं भाषण हे राजकीय दबवातून केले आहे.
अशा वक्तव्यांमुळे देशभर दंगली होऊ शकतात, यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, राज ठाकरे यांच्या आगामी सभांना परवानगी देऊ नये, या तक्रारीनंतर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, तसं झाल्यास त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असंही या तक्रारवाजीद रजाक सय्यद यांनी अर्जात नमूद केलं आहे.