मुख्यमंत्री एक्झिट मोडमध्ये? मंत्रालयातील सचिव व कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडून थेट मातोश्री गाठली. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यातच आता मुख्यमंत्री हे मंत्रालयातील सर्व सचिवांसोबतही संवाद साधणार आहेत. सचिव आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत ते आभार मानणार आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे एक्झिटच्या मोडमध्ये आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मुख्यमंत्र्यांकडून लवकरच कुठला मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयातील सर्व सचिवांना दुपारी साडे बारा वाजता ऑनलाईन संबोधित करणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त इतर सचिवही उपस्थित राहणार आहेत. सचिवांनी केलेल्या सहकार्याबाबत मुख्यमंत्री सचिवांचे आभार मानणार आहेत. मंत्रालयातील कर्मचारीही यावेळी उपस्थित राहणार, अशीही माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी काल जनतेचे आभार मानले आणि आज ते मंत्रिमंडळातील सचिव आणि अधिकाऱ्यांचे आभार मानणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.
- शिंदे गट शिवसेनेच्या चिन्हावर दावा करण्याच्या तयारीत
राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तिकडे गुवाहाटीत शिवेसेनेचे बंडखोर नेते तळ ठोकून बसले आहेत. तसेच, एकनाथ शिंदे हे शिवसेनेवरच दावा ठोकणार असल्याची माहिती पुढे येत आहे. शिंदेंएकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत, त्यामुळे शिंदे गट शिवेसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटच शिवसेना आहे, असा दावा शिंदे गट निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती आहे.